मालेगाव- राजकीय वर्तुळात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहेत. याबाबत दोन्ही पक्षांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. महाराष्ट्राच्या मनात असेल तेच घडेल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली, तर मनसे कार्यकर्त्यांमध्येही चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे. सोबतच, विविध पक्षातील नेत्यांनीही या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. या यादीत आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचाही समावेश झाला आहे. राज-उद्धव एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता दादा भुसे म्हणाले की, "हा त्यांचा अंतर्गत विषय असून त्यांनी एकत्र यायचं की नाही, हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. तसेच, त्यांनी काय निर्णय घ्यावा, हे सांगायचा अधिकार आपल्याला नाही. तसेच, इथं सगळेचजण एकमेकांना चांगलं ओळखतात. या पाठीमागचे अनेक अनुभव आहेत, प्रत्येकजण निर्णय घ्यायला सक्षम आहे, त्यांना जो योग्य वाटेल तो निर्णय ते घेतील."