पुणे : आज सकाळी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एक भीषण अपघात झाला. मुंबईतील दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान गर्दीमुळं लोकल ट्रेनमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "जी दुर्घटना घडली आहे ती दुर्दैवी आहे. मृत्यूंच्याबाबत जो आकडा समोर येत आहे त्याबद्दल अजूनही खात्री नाही. यात जखमींची संख्या देखील आहे. मध्य रेल्वे मुंब्राजवळ दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळ जाताना लोक मोठ्या प्रमाणात लटकलेली असतात. लोकांना वेळ महत्त्वाचा असतो. यात लटकलेले प्रवासी घासले गेले आणि ते ट्रॅकवर पडले. यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आणि दोघांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे हे कोणी नाकारू शकत नाही. निश्चितच चौकशी करून काय खरी परिस्थिती आहे ती समोर येईल."