पुणे : आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं आहे. पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना वारकरी विठुरायाचा गजर करत आहेत. त्यामुळं भक्तिमय वातावरण बनलं आहे. शुक्रवारी सायंकाळी संत तुकाराम महाराज यांची पालखी ज्ञानोबा माऊली-तुकाराम', टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात पुणे शहरात दाखल झाली. यावेळी पुणे शहरातील नागरिकांना उत्साहात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं स्वागत केलं. पालखी शिवाजीनगर परिसरात दाखल झाल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथाचं सारथ्य केलं. यंदा जवळपास 250 पेक्षा जास्त वारकरी दिंड्यांनी वारीत सहभाग घेतलाय. गेल्यावर्षी हा आकडा 150 ते 170 पर्यंत होता. अशा स्थितीत 250 पेक्षा जास्त दिंड्या असलेली ही पहिलीच वारी ठरली आहे.