बीड : राज्यात अनेक ठिकाणी बाल कामगारांना कामावर ठेऊन त्यांच्याकडून कामं करून घेतली जातात. असाच प्रकार बीड जिल्हातील आष्टी तालुक्यात उघडकीस आला आहे. या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून 15 बालकामगारांना कामावर ठेऊन त्यांच्याकडून विविध कामं करून घेतली जात होती. यामध्ये 9 मुली आणि 6 मुलांचा समावेश आहे. यातील दोन मुलं तेथून निसटून अहिल्यानगर शहरात गेली. यावेळी पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता हा सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर त्या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी आष्टी तालुक्यात धाव घेत या 15 बालकामगारांची सुटका केली. यातील आता सहा मुले बीडमधल्या बालकल्याण समितीकडं तर नऊ मुलींना आर्वी इथल्या सेवाश्रम प्रकल्पात ठेवण्यात आलं आहेत. या प्रकरणात आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.